मुंबई : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांची पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ज्ञानोबा-तुकोबा आणि विठूनामाचा गजर करत वैष्णव तल्लीन होऊन रिंगण करत, मुक्काम करत पायी पंढरपूरला आषाढीला भेटणार आहेत. वारीचा हाच सगळा प्रवास ‘स्टार प्रवाह’च्या ‘विठूमाऊली’ या मालिकेतून उलगडणार आहे. आईला संकटातून वाचवण्यासाठी निघालेल्या पुंडलिकाची वारी पूर्ण होणार का, हे ‘विठूमाऊली’ मालिकेत पहायला मिळणार आहे.
‘स्टार प्रवाह’वर ‘विठूमाऊली’ ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता दाखविली जाते. या मालिकेत पुंडलिकाच्या आईवर संकट आले आहे. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी विठ्ठल पुंडलिकाला पायी लोहदंड क्षेत्री यायला सांगतात. पुंडलिकाचा हा प्रवास पूर्ण झाला, तर कलीच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यामुळे कली पुंडलिकाच्या प्रवासात अडथळे आणतो. कलीने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी पुंडलिकाला विठ्ठल कशाप्रकारे मदत करतो आणि पुंडलिक लोहदंड क्षेत्रापर्यंत पोहोचतो का, या प्रश्नाचे उत्तर मालिकेच्या पुढील काही भागांतून मिळणार आहे; तसेच डोक्यावर तुळस का घेतली जाते, गंधाचा टिळा का लावला जातो, रिंगणाचे खेळ का खेळतात अशा वारीतल्या परंपरांमागील कारणेही प्रेक्षकांना कळणार आहेत.